माण नदीकाठच्या गावांना टेंभूच्या पाण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार- आ.समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) तालुक्यातील माण नदीकाठच्या शेतकऱ्यांना टेंभू पाणी योजनेतील पाणी मिळावे यासाठी जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करुन निश्चितपणे शासनदरबारी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ.समाधान आवताडे यांनी लक्ष्मी दहिवडी येथे गाव भेट दौऱ्यात बोलताना दिली . महमदाबाद(शे), लक्ष्मी दहिवडी, कचरेवाडी व डोंगरगाव या गावाचा दौरा केला त्यांच्यासमवेत जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण,भाजपा ओ.बी.सी.चे जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे,सोमनाथ आवताडे,राजन पाटील,धनंजय पाटील,संजय पवार,आदीसह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ.आवताडे म्हणाले की,तालुक्यातील पाणीप्रश्न हा केवळ राजकीय भांडवलाचा विषय न ठेवता याकडे संवेदनशील दृष्टीकोनातून टेंभू योजनेचे पाणी मंगळवेढ्याच्या सीमेवर आले तेच पाणी पंढरपूर तालुक्यातील तावशी, तनाळी, तरटगाव, सिद्धेवाडी, चिचुंबे, शेटफळ व मंगळवेढ्यातील लक्ष्मी दहिवडी, महमदाबाद (शे), गुंजेगाव, घरनिकी, मारापूर, देगांव, शरदनगर,ढवळस,धर्मगाव,मुढवी या माण नदीकाठच्या गावांना पाणी मिळवण्यासाठी सर्वेक्षण करून प्रयत्न करणार आहे. आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी तालुका आरोग्य विभाग यांच्याकडे संपर्क करुन लाभ घेण्याचेही आवाहन करण्यात आले. नवीन वीज ग्राहकांनी मागणी दिल्यास त्या ठिकाणी महावितरण ने वाढीव नवीन डी. पी चा मागणी प्रस्ताव सादर करावा अशा सूचना दिल्या. या दौऱ्यात लक्ष्मी दहिवडी येथे जिल्हा परिषद शाळांना व तलाठी कार्यालयासाठी नवीन इमारत मिळण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय लक्ष्मी दहिवडी हे गाव मारापुर महसूल मंडल मध्ये असून त्याचा गावाचा समावेश आंधळगाव महसूल मंडळ मध्ये करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.ममदाबाद शे. येथील शेतकऱ्यांनी लक्ष्मी दहिवडीच्या मंजूर 33 के.व्ही सब स्टेशनचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली कचरेवाडी येथे उजनी कालव्यालगतच्या रस्त्याची तर बचत गटातील महिलांनी ग्राम संघासाठी इमारत उपलब्ध करण्याची मागणी केली डोंगरगाव येथे रस्ते व उजनी कालव्याच्या क्रॉसिंगवर पुलाची मागणी केली. तर महिलांनी दारूबंदी करण्याची मागणी केली