
मंगळवेढा(प्रतिनिधी)इतर कोणतेही उपपदार्थ निर्मिती प्रकल्प नसताना दामाजी कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने कारखाना चांगल्या पद्धतीने चालवला त्यामुळे दामाजी कारखान्याची होणारी प्रगती हीच संस्थापक स्व.कि.रा.मर्दा यांना श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन धनश्री परिवाराचे अध्यक्ष शिवाजीराव काळुंगे यांनी व्यक्त केले.संत दामाजी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व.कि.रा.मर्दा यांच्या 107 व्या जयंतीनिमित्त कारखाना स्थळावर आयोजित कार्यक्रमाचे बोलत होते.
याप्रसंगी चेअरमन शिवानंद पाटील,व्हाईस चेअरमन तानाजी खरात,संचालक मुरलीधर दत्तू,गौरीशंकर बुरकूल,गोपाळ भगरे, राजेंद्र पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे,औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, प्र.कार्यकारी संचालक रमेश जायभाय तसेच मनोज ठेंगील, हनमंत रोकडे यांचेसह कारखान्याचे सर्व विभागप्रमुख, सभासद, शेतकरी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष शिवानंद पाटील व उपाध्यक्ष तानाजी खरात यांच्या हस्ते स्व.मर्दा व स्व शहा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना प्रा. काळुंगे म्हणाले की, स्व. कि.रा. मर्दा यांनी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करत असताना कारखान्याचा कारभार पारदर्शक करून दाखवला. त्यांचा आदर्श घेऊन सध्या आर्थिक अडचणीत असलेल्या दामाजी कारखान्यात विद्यमान अध्यक्ष ,उपाध्यक्ष व संचालक मंडळाने ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांची ऊस बिले,तोडणी वाहतूक कामाची बिले,व्यापारी देणे व कर्मचारी पगार, हंगामासाठी घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड केल्याने या संचालक मंडळावरील विश्वास वाढीस लागला. यापुढेही कारखान्याने कामकाज व्यवस्थित केल्यास कारखान्याचे अध्यक्ष कि.रा.मर्दा यांना श्रद्धांजली ठरेल. शिवानंद पाटील म्हणाले की, जेष्ठाच्या मार्गदर्शनानुसार कारखान्याचा कारभार आम्ही व्यवस्थित केला आहे ,शेतकरी, व्यापारी , कामगार,बॅका यांची देणे वेळेत दिल्यामुळे आमच्या संचालक मंडळावरील विश्वास वाढीस लागला आहे यंदाच्या हंगामात दुष्काळी परिस्थितीचा परिणाम होणार असला तरी निश्चित केलेले गाळप पूर्ण करण्याचा आमचे संचालक मंडळ प्रयत्न करेल.