मंगळवेढाराजकिय

ग्रामपंचायतींच्या गावपुढा-यांचे लक्ष ७ डिसेंबरच्या अर्ज माघारीकडे!

गावागावात फक्त निवडणूकीचीच चर्चा!

मंगळवेढा(प्रतिनिधी) तालुक्याच्या गावगाडासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली असून,उमेदवारी दाखल केलेल्या सर्वाच्या नजरा आता कोण कोण अर्ज काढतात या कडे लागल्या आहेत.दरम्यान,अनेक उमेदवारांनी मैत्री भावकी, पै-पाहुण्यांचा हवाला देत आतापुरती माघार घे आणि आपल्याला संधी दे,अशी आर्जव सुरू केलीआहे. माघारीसाठी नेत्यांकडेही फिल्डिंग लावली आहे.

टोकाची ईर्षा, संपर्काची अफाट साधने, सोशल मीडियावरून झालेला गवगवा यामुळे सर्वच उमेदवारांनी आपण निवडणूक लढवायचीच,असा चंग बांधल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.आमच्या भावकीतला एखादा सदस्य झाला म्हणून बिघडले कुठे,आम्ही कधी सरपंच व्हायचे,तुम्हालाच काय टिकली लावली आहे काय,असे ग्रामीण ढंगातील संवाद गावागावात ऐकायला मिळत आहेत.मला थांबायला सांगण्यापेक्षा तूच थांब पुढच्या वेळी मी तुझाच प्रचार करतो, अशा प्रकारची बोलावणही एकमेकांकडून केली जात आहे. माघार घेतली नाही तर विहिरीचे पाणी द्यायचे नाही, वाट द्यायची नाही, इतकेच काय, त्यांचा अन् आमचा संबंध संपला, अशा चर्चाही घराघरात सुरू आहेत.गावपुढाऱ्यांनी मात्र आमदार, खासदारांना भेटून ‘साहेब, तुम्ही काहीतरी करा; पण अमक्याने माघार घेतली पाहिजे. नाही तर आपलं काही खरं नाही. तो निवडून येणार नाही आणि आपली सीट पण जाईल,’ असे सांगत गल्लीगल्लीतील मतांची आकडेमोडही सांगत आहेत. त्यामुळे नेत्यांची पंचाईत झाली असून, दोन्हीही आपल्याच गटाचे खंदे कार्यकर्ते असल्याने बाजू कुणाची घ्यायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. काहीही करून निवडणूक लढवायचीच,असा निर्णय घेतलेल्या इच्छुकांनी विरोधी उमेदवाराने माघार घ्यावी यासाठी साम,दाम,दंड,भेद नीतीचा वापर सुरू केला आहे. आतापर्यंत झालेला खर्च देतो. शिवाय आणखी काय अपेक्षा असेल तर सांगा; पण माझ्यासाठी माघार घ्या, अशी आर्जव केली जात आहे. परिणामी, या उमेदवारांचा भाव वधारायला सुरुवात झाली आहे. माघारीच्या अंतिम क्षणापर्यंत वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्याचा प्रयत्नही काही जणांकडून होणार आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close