
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्यातील खाजगी दुध संघानी उन्हाळा असतानाही व दुधाचा तुटवडा असतानाही दुधाचे पाच ते सहा रुपये दर कमी केल्याच्या निषेधार्ह मंगळवेढा तालुका दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आंधळगांव येथे सकाळी ८.४५ वा.भव्य रास्ता रोको करण्याचे नियोजन केल्याची माहिती निमंत्रक कृषिभूषण अंकुश पडवळे व प्रा. येताळा भगत यांनी दिली. मागील महिनाभरात राज्यातील खाजगी दुध संघांनी संगनमत करुन उन्हाळा असतानाही व दुधाचा तुटवडा असतानाही दुधाचे दर सातत्याने कमी केले आहेत. पशुखाद्य, चाऱ्याचे रेट वाढलेले असतानाही व एकूण दुध उत्पादनाचा उत्पादन खर्च वाढलेला असताना दुधाचे रेट कमी करुन दुध उत्पादकांचा नफाच संपविण्याचे पाप सर्वच खाजगी दुध संघा कडून करण्यात आले आहे. उन्हाळ्या मध्ये गाई दोन ते चार लिटर दुध कमी देतात. व दर वर्षी एप्रिल व मे महिन्यात दुधाचा तुटवडा होतो व दर वाढतात. पण राज्यात पहिल्यांदाच उन्हाळ्यात दुधाचा तुटवडा असतानाही दुधाचे दर खाजगी संघा कडून कमी करण्यात आले आहेत. पशुखाद्य व चाऱ्याचे वाढलेले दर व दुध कमी यामुळे त्रस्त असनारा दुध उत्पादक दर कमी झाल्यामुळे आर्थिक संकटात सापडला असल्याचे पडवळे यांनी सांगितले. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात सहकारी दुध संघाचे जाळे असल्यामुळे तेथे तुलनेने कमी दर झाले आहेत, पण सोलापूर जिल्ह्यात ५ ते ६ रु. ने दर कमी केल्याने दुध उत्पादकांचा नफाच संपला आहे. दुध दर वाढी मुळे शेतकऱ्यांनी बँकांची कर्जे काढून दिड ते दोन लाखाच्या गाई खरेदी केल्या व कष्टाने हा व्यवसाय पुढे नेला पण दुध दर कपातीमुळे बँकांचे हप्ते कसे भागवावयाची हि चिंता दुध उत्पादकांना आहे. तसेच अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी नोकरी मिळत नसल्याने दुग्धव्यवसाय करुनच आपले करिअर करण्याचा मार्ग स्विकारला पण खाजगी दुध संघांचा दर कपातीचा निर्णय व शासनाचे धोरण यामुळे पशुपालक उध्वस्त व्हायची वेळ आली आहे. शासन दुग्धव्यवसायाला संरक्षण देत नसेल व गांभीर्याने बघत नसेल तर सुशिक्षित तरुण मुलांनी कोणता निर्णय घ्यायचा ते आता शासनानेच सांगावे यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये असे ही पडवळे यांनी सांगितले. ” उन्हाळ्यात दुधाचे वाढलेले रेट खाजगी संघांनी संगनमताने कमी केले. पण दुधापासून बनणारे दुग्धजन्य पदार्थ, दुध पॕकिंग, पशुखाद्या सह इतर गोष्टी चे दर कमी केले नाहीत. दुधाचे कमी केले दर व दुग्धजन्य पदार्थाच्या दरातील तफावत खाजगी संघाला मिळत आहे, व शासन बघ्याची भुमिका घेत असेल तर तरुण दुध उत्पादक शेतकरी तीव्र आंदोलन करतील.”- कृषिभूषण अंकुश पडवळे.