
शिर्डी(विशेष प्रतिनिधी) आघाडीची वाट पाहत बसण्यापेक्षा स्वबळावर लढण्याची तयारी करा. आपली ताकद दिसली तरच मित्रपक्ष आपल्यासोबत चर्चा करायला येतील, त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तुम्ही कामाला लागा, असा आदेश राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिला. शिर्डी येथील राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. या वेळी अजित पवार यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांना सावधगिरीचा सल्ला दिला. विरोधक आपल्या पक्षातील लोकांनाही आमिष दाखवत आहेत. आपल्या लोकांनाही काही सांगत आहेत. पण, त्यांच्या आमिषाला बळी पडू नका. जे पक्ष सोडून गेले, त्यांना आता पश्चातप होत आहे. त्यांना वाटत जे केलं ती चूक झाली, असेही पवार म्हणाले. ज्या घरात वाढले, त्या घरात फूट पाडणे योग्य नाही. मुख्यमंत्रीपद मिळविणे ठिक पण पक्ष योग्य नाही. हा फक्त शिवसेनेचाच प्रश्न नाही अशा प्रकारामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण देण्याचे काम महाविकास आघाडीने केले. या आरक्षणाचे श्रेय आरक्षण विरोधी लोक घेऊ पाहत आहेत. मंडल आयोगाला विरोध करणाऱ्यांचा बुरखा फाडायला हवा. लोकशाहीत वेळेवर निवडणुका व्हायला. हव्यात निवडणुका न घेणे लोकशाहीला चांगले नाही लोकशाहीला नख लावून गळा घोटण्याचे काम सुरू आहे, असा आरोप राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केला.विरोधी पक्षनेते पवार म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाने त्यांची जबाबदारी वेळेवर पार पाडणे आवश्यक आहे. महागाई व बेरोजगारीचे संकट देशात आहे. काही लाख कोटींची गुंतवणूक गुजरातला गेली आहे. आमच्याबरोबर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवीन प्रकल्प राज्यात येणार असल्याचे सांगतात. मी स्वतः रतन टाटांना भेटलो होतो. ते राज्यात गुंतवणूक करणार होते. मात्र, सत्ता परिवर्तन होताच राज्यातील २५ हजार ३६८ कोटींचे प्रकल्प गेले, असे असले तरी विरोधक मात्र हिटलरची गोबेल नीती राबवित आहेत. राज्यातून गेलेल्या प्रकल्पापेक्षाही मोठे प्रकल्प आणू, असे राज्यातील सत्ताधारी सांगत असले तरी गेलेल्या प्रकल्पापेक्षा मोठे प्रकल्प आणण्याची धमक सरकारमध्ये नाही.