मंगळवेढा तालुक्याला ट्रिगर टु चे निकष लावून शेतकऱ्यांची केली चेष्टा- प्रशांत साळे
आ.प्रणितीताई शिंदे व जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणार

मंगळवेढा(प्रतिनिधी) दुष्काळी तालुक्यात मंगळवेढ्याचा समावेश करावा म्हणून आम्ही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या माध्यमातून प्रयत्न केले.परंतु शासनाने मंगळवेढा तालुक्याला ट्रिगर वन मधील निकष न लावता ट्रिगर टु चे निकष लावून आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदतीतून वगळल्यामुळे येणाऱ्या काही मंगळवेढा काँग्रेसच्या वतीने आ.प्रणितीताई शिंदे व जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणार असल्याचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी काँग्रेस कार्यालयात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
यावेळी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिवशंकर कवचाळे, ओबीसीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग माळी, विष्णु शिंदे,दिलीप जाधव, मारुती वाकडे,भीमराव मोरे,बापू अवघडे, सुनीता अवघडे, संदीप पवार, शहाजी कांबळे ,आकाश भोसले, संतोष शिरसागर, अविनाश मुंगसे, रवी काटे, नागेश आकळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रशांत साळे म्हणाले की तालुक्याच्या आर्थिक विकासात भर देणारे संत चौखामेळा आणि बसवेश्वर स्मारकाचा प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित राहिल्यामुळे तालुक्यामध्ये नवे रोजगार निर्माण होऊ शकलेले नाहीत त्यामुळे नवोदित व्यवसायाभिमुख तरुणांना स्थलांतरित व्हावे लागत आहे. तालुक्यातील मंगळवेढा उपसा सिंचन योजना, महात्मा बसवेश्वर व चोखामेळा स्मारक या प्रश्नासाठी आम्ही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व प्रदेशध्याक्ष नाना पटोले यांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केल्यानंतर याचे श्रेय काँग्रेसला जाईल म्हणून आम्हाला जाणून-बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. सोलापूर लोकसभा मतदारसंघ दुष्काळी तालुक्यातून वगळण्यात आला होता. यामध्ये नव्याने दुष्काळात समावेश करताना ज्या आठ सवलती जाहीर करण्यात आल्या त्यातील अनेक सवलती पासून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार नाही.तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून शेतकऱ्यानी खरिपातील पेरणीसाठी केलेला खर्च वाया गेल्याने आर्थिक अडचणीत आले आहे त्यामुळे या दुष्काळ सवलतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरीप व फळपिकासाठी सरसकट आर्थिक मदत सरसकट देणे आवश्यक आहे परंतु तसे आश्वासन नव्या शासन निर्णयामध्ये देण्यात आले नसल्यामुळेच तालुका जाहीर केल्याचा दावा हा फसवा आहे. तालुक्यातील पाटकळ हे नवे मंडल या मदतीपासून वगळले आहे असे त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. तालुक्यातील प्रश्नासाठी प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी वारंवार केलेल्या पाठपुरावा कौतुकास्पद असून भविष्यात देखील तालुक्यातील प्रश्नावर त्यांनी आवाज उठवावा त्यासाठी काँग्रेसच्या माध्यमातून पूर्ण सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा दुष्काळ तालुक्यात मिळणाऱ्या योजनेपासून वंचित राहणार असल्याने काॅग्रेस नेत्या आ. प्रणिती शिंदे व जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन उभा करणार आहोत. सध्या सत्ताधारी पक्षाने लोकशाही धोक्यात आणली आहे मात्र हीच लोकशाही टिकवण्याची जबाबदारी माध्यमाची आहे यापूर्वी काही प्रश्नावर काँग्रेसने आंदोलन केल्यानंतर त्या प्रश्नाची दखल घ्यावे लागली परंतु श्रेयासाठी ते प्रश्न तसेच थांबवून ठेवण्यात आल्याची खंत तालुकाध्यक्ष साळे यांनी यावेळी व्यक्त केली.