
मंगळवेढा(प्रतिनिधी)लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे उमेदवार आ. राम सातपुते व काँग्रेसचे उमेदवार आ.प्रणिती शिंदे या दोन्ही आमदारामध्ये राजकीय वार जोरात सुरू असताना मंगळवेढ्यात रखडलेले प्रश्नासह सद्यस्थितीतील प्रश्न आमच्यामुळे मार्गी लागले हे सांगण्यासाठी सोशल मीडियातून चढाओढ लागली. तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यांना सध्या अनेक प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे गेले अनेक वर्ष राजकीय व्यासपीठावर तरंगत असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस नुकतीच कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली. त्यावर आ. प्रणिती शिंदे यांनी मी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला.याचे विरोधकाला श्रेय जाईल या भितीपोटी लगेच कॅबिनेटची बैठक घेत यास मंजुरी दिल्याचे गाव भेट दौऱ्यात सांगितले तर आ. अवताडे समर्थकानी त्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देत आ.आवताडे यांनी 2021 च्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केलेल्या प्रश्नाचा व्हिडिओ जोडून आम्ही सतर्क असल्याचे समर्थक सध्या सोशल्य मीडियातून सांगू लागले. तर सोलापूर साठी उजनी धरणातून नुकतेच पाणी सोडण्यात आले. या पाण्यासाठी नदीकाठचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. नदीकाठचा शेतकरी उध्वस्त होणार असल्याने तो वीजपुरवठा चार तासावरून आठ तास करण्याची मागणी आ. प्रणिती शिंदे यांनी 2 एप्रिलला केली.त्याचबरोबर आ. समाधान आवताडे यांनी देखील ती मागणी जिल्हाधिकारीकडे तर मा. आ. प्रशांत परिचारक यांनी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रशासनाकडे केली आहे.
या मागणीची दखल प्रशासनाने नदीकाठचा वीजपुरवठा आठ तास करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे यात कोणी यश मिळवले हे सांगण्यासाठी नेत्यासह समर्थकात सोशल मीडियातून आमच्यामुळे प्रयत्न झाला हे सांगण्यासाठी त्यांच्या समर्थकांमध्ये चढाओढ सुरू झाली त्यामुळे लोकसभा निवडणूक होईपर्यंत आणखीन कोण कोणते रखडलेले प्रश्न मार्गी लागतात याबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली.
चिक्कलगी व शिरनांदगी येथील ऊसतोड मजुराच्या अपघात प्रकरणात देखील उपचार करण्यापासून ते शवविच्छेदन करण्यासाठी पाठपुरावा केला.आ. प्रणिती शिंदे या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावडे दौऱ्यात अनेक प्रश्नांवर चर्चा झाल्यानंतर त्याची तात्काळ निवेदने प्रशासनाकडे देत आहेत तर आ. समाधान आवताडे हे देखील आ राम सातपुते यांच्या विजयासाठी घोंगडी बैठकीतून लोकांशी संपर्क साधत आहेत ते देखील तात्काळ त्यावर निर्णय घेऊ लागले आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारातील चुरस नागरिक व शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी कारणीभूत ठरू लागली.